Report by Rtn. PP Anjali Sahasrabuddhe
अनेक वर्ष सातत्याने पोलिओ लसीकरण करून रोटरीने जगभरातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये मोठी कामगिरी केली. त्यानंतर अशा कुठल्या क्षेत्रा मध्ये रोटरीने सहभाग घेतला असता फार मोठा बदल घडून येईल असा विचार चालू असताना लिटरसीह्या अतिशय आवश्यक असलेल्या क्षेत्रा मध्ये कामकरायचे रोटरीने ठरवले.
रोटरी इंडिया लिटरसी मिशन (RILM) ची स्थापना करून T E A C H हा साक्षरतेवर सर्वंकष काम होईल असा कार्यक्रम आखलागेला. त्यामध्ये T म्हणजे टीचर्स ट्रेनिंग, E म्हणजे इ लर्निंग, A म्हणजे एडल्ट लिटरसी C म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि H म्हणजे हॅपी स्कूल अशा सर्व क्षेत्रात काम करण्यासाठी योजना आखण्यात आली.
७ वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची रोटरीच्या एका सेमिनार मध्ये मला माहिती कळली आणि माझ्या लक्षात आलं हेच मला आवडेल असे क्षेत्र आहे. त्यातही प्रौढ साक्षरता या विषयाकडे मीआकर्षित झाले आणि त्या मध्ये काम करायचे ठरवले.
माझ्या असं लक्षात आलं की माझ्या कंपनीत काम करणाऱ्या 18 महिला निरक्षर आहेत. त्यांना साक्षर करण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला. कामाच्या वेळेतच रोज तासभर त्यांना आमच्याच कंपनीतल्या staff पैकी एका महिलेने साक्षरतेचे धडे दिले. ह्या नवसाक्षर महिलांचे अनुभव ऐकून आपण हे काम रोटरीच्या माध्यमातून करायलाच हवे असा मी निश्चय केला. मग मी डिस्ट्रिक्टच्या लिटरसी कमिटीमध्ये प्रौढ साक्षरता या विभागाची पाच वर्ष जबाबदारी सांभाळली. सुरुवातीला काहीच यश येत नव्हते. निरक्षर लोकांचे गट तयार करून त्यांच्यातल्याच शिक्षित व्यक्तीला साक्षरता वर्ग चालवण्याचे शिक्षण देऊन हे वर्ग चालवायचे होते. असे गट शोधणे, त्या लोकांना प्रौढ वयात शिक्षणाचे महत्व पटवून देणे हे मोठेच अवघड काम होते. 15 ते 20 जणांचा गट जमल्यावर मग पुढचे आव्हान. त्यांना रोज एकत्र जमवून त्यांचा वर्ग घेण्याचे. मी रोज साक्षरता वर्गाला जाणार, मला माझी पुस्तकं मिळणार ही गोष्ट वर्गात येणाऱ्या महिलांना अतिशय आनंद देणारी असते.
खूप शोध घेतल्यानंतर श्री परेश यांच्याकडून सोमेश्वर साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगार महिलांसाठी साक्षरता वर्ग घेता येतील असे कळले. त्यांच्या वस्तीवरच रात्री मिणमिणत्या उजेडात हे वर्ग भरविले.
पहाटे तीन साडेतीनला उठून स्वयंपाक पाणी आवरून ही मंडळी ऊस तोडणीला जातात. संध्याकाळी घरीआल्यावर जेवण करून सगळे आवराआवरी करून या महिला साक्षरता वर्गाला येत असत. साक्षरता वर्गांच्या निमित्ताने ऊस तोडणी कामगारांचे जगणे मला जवळून बघायला मिळाले.
प्रौढ निरक्षरांचे गट शोधता शोधता डॉक्टर अमोल वाघमारे यांच्याशी संपर्क झाला. स्टेट रिसोर्स सेंटर या सरकारी संस्थेतर्फे अमोल प्रौढ साक्षरतेचे काम करत होते. अमोलने धायरी परिसरात निरक्षरांचा एक गट आपल्याला तयार करून दिला. आपल्या क्लबतर्फे धायरीतला साक्षरता वर्ग चालविण्यात आला. तो आपल्या क्लबचा पहिलं प्रौढ साक्षरता वर्ग. या मध्ये पंधरा महिला शिकल्या. लिहिण्या वाचण्याबरोबरच कायदा साक्षरता, बँकेची ओळख पोस्टाची ओळख, आरोग्य बद्दलची माहिती अशा अनेक गोष्टी साक्षरता वर्गात आपण शिकवितो. अमोल मुळेच आपल्याला भीमाशंकर परिसरातील प्रोढ निरक्षरांची गट मिळाले. चार वर्षांमध्ये आपण फलोदे परिसरातील आदिम संस्कृती सेवा संस्था यांच्या सहकार्याने सुमारे सहाशे महिलांना साक्षर केले. अजून ही रोटरीच्या माध्यमातून साक्षरता वर्ग सुरू आहेत. यंदाच्या वर्षी आपल्या रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोतर्फे आंबेगाव तालुक्यात दोन ठिकाणी वर्ग सुरू आहेत.
त्यांच्या सहकार्याने कस्तुरबा वसाहत येथेही साक्षरता वर्ग सुरू आहे. प्रौढ शिक्षणाचा उद्देश प्रौढांमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणणे आहे. साक्षरता क्षमतांचा विस्तार करून जीवन सुधारते ज्यामुळे आरोग्य आणि शाश्वत विकासावर सकारात्मक परिणाम होतो. प्रौढ शिक्षणामुळे व्यक्तींना त्यांचे मूलभूत अधिकार समजण्यास मदत होते आणि घरगुती हिंसाचार आणि बालविवाह यांसारख्या गुन्ह्यांविरुद्ध सुधारात्मक उपाय योजना करण्यात मदत होते